आजचा माणूस प्रत्यक्ष जीवनापेक्षा अधिक वेळ आभासी जगात जगत आहे. अलीकडील काही वर्षांत समाजमाध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. मुळात समाजमाध्यमे ही एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी, योग्य माहिती योग्य व्यक्तीपर्यंत देण्यासाठी व घेण्यासाठी अशा कारणांसाठी तयार करण्यात आली आहेत. अगदी दूर अंतरावरील व्यक्ती काही क्षणांतच संपर्कात येते. एखाद्या ठिकाणी होणाऱ्या पुस्तक प्रदर्शन, नाटक इत्यादी कार्यक्रमांची माहिती सहज मिळते. खरेदी-विक्री करता येते तसेच प्रशिक्षण (इंटर्नशिप) आणि नोकरीच्या संधींबाबत माहिती मिळते. त्यामुळे समाजमाध्यमांमुळे जग नक्कीच जवळ आले आहे.

मागील आयुष्यातील ओळखीतील व्यक्ती पुन्हा संपर्कात येतात. स्वतःच्या व्यवसायाची जाहिरात करता येते आणि विविध बातम्यांची माहिती मिळते. फेसबुक, इंस्टाग्राम, लिंक्डइन आणि व्हॉट्सॲप यांसारखी समाजमाध्यमे आज मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहेत. लग्न, साखरपुडा, मुंज इत्यादी कार्यक्रमांची पत्रिका आता या माध्यमांच्या सहाय्याने पाठवली जाते. काही वेळा प्रत्यक्ष बोलणे शक्य नसल्याने संदेश पाठवला तरी चालतो. ज्याला संदेश पाठविला आहे तो आपल्या सोयीने तो वाचतो. व्हिडिओ, ऑडिओ आणि मजकूर संदेशांची सुविधा ही समाजमाध्यमे देतात. एकंदरीत समाजमाध्यमांनी आपल्या वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक तसेच मानसिक जीवनावर मोठा परिणाम केला आहे.

परंतु ‘अति तिथे माती’ या म्हणीप्रमाणे समाजमाध्यमांचा अतिरेक काही जणांसाठी घातक ठरत आहे. प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे वैयक्तिक जीवन असते. त्यात सुख-दुःख, प्रेम-राग तसेच इतर अनेक भावना सामावलेल्या असतात. आपल्या आयुष्यातील कोणत्या गोष्टी इतरांना सांगायच्या किंवा सांगायच्या नाहीत, हा पूर्णपणे वैयक्तिक निर्णय असतो. तो निर्णय प्रत्येकजण स्वतःहून घेतो. तसेच स्वतःच्या जीवनातील कोणत्या गोष्टी समाजमाध्यमांवर टाकायच्या, हा देखील त्याचाच निर्णय असतो. मात्र त्या माहितीची गोपनीयता आणि सुरक्षितता कितपत राखायची, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे.

समाजमाध्यमांवर माहिती टाकताना काही प्रमाणात मर्यादा असणे अत्यंत गरजेचे आहे आणि ती मर्यादा प्रत्येकाने स्वतःवर घालणे आवश्यक आहे. अन्यथा त्या माहितीची गोपनीयता नष्ट होऊन ती सार्वजनिक होते. आजच्या काळात माहिती हे एक प्रभावी शस्त्र बनले आहे. त्यामुळे माहिती शेअर करताना सामाजिक भान असणे आवश्यक आहे. प्रत्येक गोष्ट समाजमाध्यमांवर शेअर करणे धोकादायक ठरू शकते आणि त्याचे वाईट परिणाम दिसून येतात.

समाजमाध्यमांच्या अति वापरामुळे मानसिक आणि शारीरिक परिणामही पाहायला मिळतात. हे परिणाम पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर तसेच ती पोस्ट वाचणाऱ्यावरही दिसून येतात. इतरांचे स्टेटस किंवा पोस्ट पाहून स्वतःची तुलना होऊ शकते. त्यामुळे असूया, राग किंवा निराशा यांसारख्या भावना वाढीस लागतात. सतत पोस्ट आणि स्टेटस पाहण्यात वेळ वाया जातो. समाजमाध्यमांवरील प्रत्येक क्लिकची नोंद घेतली जाते आणि त्यानुसार वापरकर्त्यासमोर कोणती पुढील पोस्ट दाखवायची, हे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अल्गोरिदम ठरवतात. म्हणूनच समाजमाध्यमांचा वापर मर्यादित आणि जाणीवपूर्वक करणे आवश्यक आहे.

समाजमाध्यमांवर अनेक अनोळखी व्यक्ती मित्र म्हणून जोडलेल्या असतात. अशा वेळी गरज नसताना स्वतःची वैयक्तिक माहिती अति प्रमाणात देणे चुकीचे आहे. आनंद घेण्यासाठी असलेले जीवन आपण स्वतःहून इतरांना आपल्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याची संधी देतो, हे योग्य नाही. कदाचित आज आपण या गोष्टीत इतके पुढे गेलो आहोत की पूर्णपणे माघार घेणे शक्य नाही. तरीसुद्धा स्वतःहून काही मर्यादा घालणे अत्यंत आवश्यक आहे.

म्हणूनच समाजमाध्यमांवर किती वेळ घालवायचा आणि कोणत्या उद्देशाने घालवायचा, हे वापरापूर्वी ठरवणे गरजेचे आहे. जीवनातील प्रत्येक वैयक्तिक बाबीची सुरक्षितता आणि गोपनीयता कायमस्वरूपी अबाधित राहिली पाहिजे. गरजेपुरता वापर केल्यास समाजमाध्यमे उपयुक्त ठरतात. अति वापर आणि त्याचे दुष्परिणाम टाळणे यामुळे शक्य होईल. त्यामुळे वैयक्तिक जीवन आणि समाजमाध्यमावरील जीवन यांच्यात योग्य अंतर ठेवण्याचे भान प्रत्येकाने बाळगणे आवश्यक आहे. आनंदासाठी असलेले जीवन समाजमाध्यमांवर कितपत वैयक्तिक किंवा सार्वजनिक ठेवायचे, याचा सुज्ञपणे विचार करणे गरजेचे आहे.

– श्री. सुरज दिलीपराव कुलकर्णी, M. E., C-DAC
सहाय्यक प्राध्यापक, JSPM चे भिवराबाई सावंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, वाघोली, पुणे
Leave a Reply